उर्वी. रोज भेटायची सकाळी. आठ तेवीस लोकल ला. कायम कुठल्या तरी टेन्शन मध्ये. चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. कधी ऑफिस च टेन्शन.कधी घरातलं. कधी जाता जाता भाजी घेऊन जायचं डोक्यात. कधी मुलीला ताप आलेला असताना सुट्टी मिळाली नाही म्हणून अर्ध लक्ष घरात ठेऊन निघायला लागायचं. एक ना दोन. घर म्हणाल्यावर शंभर गोष्टी चालू. घड्याळाच्या काट्यावर घरातले आवरून धावत पळत एकदा आठ तेवीस पकडली की गंगेत घोड न्हायल. मग ती सुटकेचा श्वास सोडायची. त्या गर्दीत. घुसमटलेला. तरीही मोकळा श्वास. आणि मग हमसून हमसून रडून घ्यायची. का रडू यायचं ते तिला पण नाही कळायचं. आम्ही रोज बघायचो. कधी विचारायचो. कधी पाणी द्यायचो. कधी नुसते हसायचो तिच्याकडे बघून. आधार द्यायचो.
तिला वाटत राहायचं. कशा या मुंबई च्या बायका. इतकी धावपळ करून पण टापटीप. नीटनेटक्या. कायम हसऱ्या कशा काय राहू शकत असतील. तिला आठवायच. तिचं गाव. रत्नागिरी जवळ च छोटंसं गाव. तशी कष्टाची सवय होती तिला. मेहनती, काटकसरी. टुकीने घर चालवणारी. ती गावाकडे असताना कशी होती. उत्साही. हसतमुख. सणवार गाणी म्हणत हसत खेळत करणारी. प्रसन्न. वक्तृत्व स्पर्धेत नंबर एक. निबंधात नंबर एक. गाण्यात नंबर एक. लग्न ठरलं. मुंबईची फॅमिली. गिरगावातल्या जुन्या वस्तीत सासर. मुंबई मध्ये नोकरी ही एक स्वतंत्र संस्था. पायाला भिंगरी लागलेलं आयुष्य. ही मुंबईची धावपळ नशिबी आली आणि सगळं बंद पडलं. हौस मौज. घड्याळाच्या काट्यावर चालणारी बाहुली झाली तिची. परत एक हुंदका अनावर झाला तिला.
या सगळ्या गडबडीत एक दिवस ट्रेन मध्ये मोबाइल बघता बघता, तिला ऑनलाईन होत असलेल्या एका लेखकांच्या स्पर्धे बद्दल कळलं. आणि तिनी हिम्मत करून नाव नोंदवलं. बास! एक छोटीशी घटना पण तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. स्पर्धेसाठी कथा लिहायची म्हणाल्यावर ती ट्रेन मध्ये त्या दृष्टीने विचार करू लागली. तिथेच उभ्या असलेल्या तिच्याच डब्यात तिला रोज भेटणाऱ्या मुली तिच्यासमोर कथेतले एक एक पात्र बनून फेर धरू लागल्या. ती निरीक्षण करायला लागली. Footboard वर उभी राहणारी, तरीही मस्त मजेत वाऱ्यावर केस भुरुभुरू उडू देणारी श्वेता. रोज ट्रेन मध्ये भाजी निवडणाऱ्या सुलक्षणा काकू. उतरायच्या एक स्टेशन आधी पासून केस सारखे करून, मेक अप करून मग टापटीप ऑफिस ला जाणारी HR department head प्रिया. पाचवा महिना लागलेली, खिडकीत राखीव सीट पटकवलेली स्नेहल. या सगळ्यांशी गप्पा मारून त्यांच्यासाठी नवीन नवीन कानातले गळ्यातले विकायला घेऊन रोज त्याच ट्रेन मध्ये येणारी छोटी बिझिनेस वाली लक्ष्मी. ताजे मासे विकायला आणणाऱ्या कामत काकू. आणि सगळ्यांना सुगंधाने बांधून ठेवणारी सोनचाफा आणि मोगऱ्याचे गजरे विकणारी चंपा. अशा कितीतरी बायका तिचेच प्रतिरूप घेऊन तिला भोवती फिरताना दिसायला लागल्या.
या प्रत्येकीला निरखून बघताना तिला जाणीव व्हायला लागली. तिच्या सोबत अशा खूप बायका आहेत. ज्यांचे आयुष्य घड्याळाला बांधले गेले आहे. तरीही त्या आनंदात जगत आहेत. तिची घुसमट हळू हळू कमी व्हायला लागली. हळू हळू ती या सगळ्याचा आनंद घ्यायला लागली. प्रत्येकाशी संवाद साधू लागली. सुखदुःख वाटून घेऊ लागली. एकीकडे तिची कथा उमलत चालली होती. शाळेत वकृत्व देताना आत्मविश्वासाने उभी राहणारी उर्वी तिला परत सापडायला लागली होती. तिच्या कलेने तिला जगण्यातली गंमत परत एकदा उलगडून दाखवली होती. रोज ती ऑफिस ला जाताना एक भाग लिहायची. परत येताना तोच भाग व्याकरण तपासून सुधारून घ्यायची. असे करत करत तिची दीर्घकथा आकार घ्यायला लागली. आणि तिच्यातली उर्वी नावासारखी पूर्णाकार घेऊ लागली. कधी चंद्राच्या शीतल छायेत. कधी सूर्याच्या प्रखर किरणात. कधी कोसळणाऱ्या श्रावण सरींमध्ये. सोनचाफा, त्याचा घमघमाट तिला मोहून टाकू लागला. हळूहळू रमली ती. संसारात. मुंबईत. ट्रेन च्या विश्वात.
नियती नियती म्हणतात ती काय असते? एक वीत फक्त. मनगटात असलेली ताकद. तिथून ती तळहातावर येते. त्यावर असलेल्या रेषा. त्यातून ती अडखळते. ठेचकाळते. दुखावते. सुखावते. नाचते. गाते. बागडते. आणि मग ती अजून थोडी पुढे येते. हाताच्या बोटांचा मोर करून त्यात पकडलेली तिची लेखणी त्यात जाऊन विसावते. तिची ताकद. तिचा आनंद. तिचे सृजन.
तळहातावरच्या च्या रेषांमध्ये धावताना तिने शोधली तिची कला. जोसापली तिची आवड. आणि ती भरभरून हसली. दिलखुलास. मोकळेपणाने. आता ती सज्ज झाली. आवाहनांना तोंड द्यायला. तिची कथा मालिका तर पूर्ण झालीच. आणि तिनी पुढची लेखमाला लिहायला घेतली नकळत पणे. जगण्यातले कलेचे महत्त्व..!!
-- अवनी गोखले टेकाळे
खरं तर तुलना करूच नये,कोणाची कोणाशी !
ReplyDeleteलेखणी स्वतंत्र असावी..असते ज्याची त्याची!
मग ती व पु ची असो वा अवनीची!
#ऊर्वी वाचतांना, एखाद्या चलचित्राची पटकथा वाचता वाचता त्या कथानकातील पात्रांनी सभोवताली फेर धरावा..आपणही त्यातलेच एक होऊन जावं..!
असंच आणखी बरंच काही जाणवलं,जे शब्दातीत.!✍👌👌👌